Wednesday, December 29, 2010

आधी आणि नंतर...


तालिबान्यांनी बुद्धाच्या मूर्ती उद्‍ध्वस्त केल्याची बातमी कानी आली तेव्हा खूप अस्वस्थता आली. काही क्षण भिरभिरल्यागत झालं. हे सारं चालंलय तरी काय, कुणीच कसं हे थांबवू शकत नाही या भावनेनं एक विचित्र अगतिकतेची भावना मनाला स्पर्श करून गेली. बाबरी मशीद उद्‍ध्वस्त झाल्याची बातमी ऐकली तेव्हाही असंच काहीसं वाटलं होतं. नंतर वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या गगनचुंबी इमारतींवर विमानं धडकवली गेली तेव्हाही तसंच काहीसं झालं होतं आणि काल परवा पुण्यात दादोजी कोंडदेवांचा पुतळा कापून काढल्याची बातमी ऐकावयास मिळाली तेव्हा झालेली मानसिक अवस्था यापेक्षा काही फारशी वेगळी नव्हतीच! या सगळ्या घटनाक्रमात ज्या कलावंतानं ते शिल्प उभं केलं होतं त्या कलावंताला हे सारं पाहून काय वाटलं असेल? याची दखल एकाही वृत्तपत्राला अथवा वृत्तवाहिनीला घ्यावीशी वाटली नाही यावरून महाराष्ट्रात कलेला आणि कलावंतांला काय स्थान आहे याची कल्पना येते. ‘चिन्ह’ हे कलावंतांचंच व्यासपीठ आहे म्हणूनच आजपासून पुढले काही दिवस या घटनेसंदर्भातल्या महाराष्ट्रातल्या कलावंतांच्या प्रतिक्रिया आम्ही प्रकाशित करणार आहोत. दादोजी कोंडदेवांचं शिल्प ज्यांनी साकारलं ते कोल्हापूरचे नामवंत शिल्पकार संजय तडसरकर  म्हणतात,


आपण अगतिक आहोत...

“कलाकारचं असं असतं की कुठलीही कलाकृती असू द्या; नाट्यकृती असो, साहित्यातली असो, चित्र असो वा शिल्प असू द्या. ती कलाकृती निर्माण करताना कलाकार त्याविषयाशी पूर्णपणे एकरूप झालेला असतो,कलानिर्मिती झाल्यानंतरही ही एकरूपता असते पण काही काळापुरती. नंतर त्यापासून कलाकार अलिप्त होतो. परंतु ती कलाकृती कुठल्या उद्देशानं निर्माण झाली आहे, त्याचा समाजावर काय परिणाम होणार आहे याचा विचार त्याच्या मनात सतत घोळत असतो. लालमहालातला दादोजी कोंडदेवांचा पुतळा कुठलाही मागचा पुढचा विचार न करता तडकाफडकी काढणं, याला नक्कीच राजकीय खेळीचं वळण मिळालेलं आहे. हे शिल्प माझ्याकडून निर्माण झाल्यानंतर काही काळानं मी त्यापासून अलिप्त झालो. पण दोन दिवसांपूर्वी जी घटना घडली त्यानं मन खिन्न झालं. हा मुद्दा चर्चेतून सोडवता आला असता. पण हल्ली कोणाही राष्ट्रपुरूषाचा पुतळा टार्गेट करणं फार सोप्पं झालंय आणि त्यामुळे स्वत:ची राजकीय पोळी भाजणार्‍यांचं असं फावतय.

आमच्यातले सर्व ज्येष्ठ शिल्पकार असं म्हणतात की समाजमन घडवण्यात कलाकार मोठी भूमिका बजावतो. मला असं वाटतं की त्यांनी स्वत:हून या घटनेवर भाष्य करावं. एखादा पुतळा साकारताना त्यातल्या सौंदर्याचा भाग हा फार महत्त्वाचा असतो. त्यासाठी कलाकार जीव ओतून काम करत असतो; पण ह्या पुतळ्याला ज्याप्रकारे कटरने कापून हटवलं गेलं त्यावरून एकच लक्षात येतं की हा प्रकार करणार्‍यांचा आमच्यासारख्या कलावंतांच्या किंवा तो पहाणार्‍या जनसामान्यांच्या संवेदनशीलतेशी काडीमात्रही संबंध नाही.

ही घटना घडून गेली म्हणजे भविष्यात असं काही होणारच नाही असं नाही. त्यामुळे शासनानं तज्ज्ञांशी चर्चा करून कुठलीही कलाकृती निर्माण करताना कलाकाराच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बंधनं न आणता कलाकृती निर्माण करण्यासंबंधीचे काही नियम आखून द्यावेत. ज्यामुळे भविष्यात अशा घटना टाळता येतील. झाल्या प्रकाराचं वाईट तर वाटतंच पण हा सर्वच प्रकार कलेच्याच नव्हे तर सबंध समाजासाठी देखील घातक असताना आपण काही करू शकत नाही याचं दु:ख सलत राहतं.”

शब्दांकन
अमेय बाळ

5 comments:

  1. काळ्जी करु नका पुतळा अजून safe आहे फ़क्त वेगळा झाला आहे.

    ReplyDelete
  2. What do you mean by "SAFE" aahe Vaibhav? Safe in physical manner has no importance in this issue. Detaching it from the entire sculpture is the issue. Any artwork is not SAFE until and unless it is been kept with well respect and dignity. Unfortunately we have lost both.

    ReplyDelete
  3. Statue is installed at more popular location...that's the good thing...no one viist lal mahal these days

    ReplyDelete
  4. asepan hvayala pahijech.shevati vidwatta kunachi maktedari nahi.

    ReplyDelete
  5. asepan kahitari vhayala pahijech.ektar vidwatta kunachi maktedari nahi.khota guru chalnar nahi.yat tadsarkarncha dosh nahi.sarv bahujan samaj aajhi eka vishisht vargachya gulamgirit aahe.amhi hi gulamgiri khapvun ghenar nahi.

    ReplyDelete