Thursday, December 30, 2010

आधी आणि आता


प्रख्यात शिल्पकार भगवान रामपुरे म्हणतात

हे शिवरायांचा पुतळाही हटवतील.



दादोजी कोंडदेवांचा पुतळा हटवल्या संबंधिच्या गेल्या दोन दिवसातल्य बातम्या जर चाळल्या तरी लक्षात येतं की समाजत हिंसकता किती वाढली आहे. तोडफोड, जाळपोळ, हाणामारी यांसारख्या घटनांनीच मथळेच्या मथळे भरले आहेत. मला वाटतं पुतळ्यावरून राजकारण करणार्‍यांना हेच हवं आहे. ज्याप्रमाणे जंगलामधली जनावरं कपळातलं स्वत:च अस्तित्व टिकवण्यासाठी आपल्या हिंस्र रूपातून आपली ताकद दाखवत असतात, त्याच प्रमाणे मानवी समाजातले(जो यांना आपला कळप वाटतो) ते हे नरपशू आपल्या शक्तीप्रदर्शनातून मीच कसा श्रेष्ठ हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. या सर्वांची वृत्ती लांडग्यांची आहे. त्यांना स्वत:शिवाय कुणाचंच भलं दिसत नाही.

आपल्या एखाद्या कृतीमुळे समाजात त्याचे काय पडसद उमटणार आहेत याची पूर्व कल्पना असतानाही, अशी कृती करणं हा निव्वळ राजकीय खेळीचाच एक भाग आहे. मग त्यात कोण कोण आणि कितीजण भरडले जातात याची त्यांच्यापैकी कुणालाच पर्वा नाही. एखादी कलाकृती निर्माण करताना तिचा निर्माता कलाकार किती कष्ट उपसतो, त्यामागे त्याची कित्येक महिन्यांची तपश्चर्या असते, साधना असते; त्यातून मग ती कलाकृती कशा प्रकारे निर्माण होते याच्याशी या सगळ्यांना काहीही देणं-घेणं नाही. ना कोणाला दादोजींविषयी काही वाटतं ना शिवाजींविषयी. उद्या उठून स्वत:ची ताकद सिद्ध करण्यासाठी शिवरायांचा पुतळा हटवायला देखील मागे पुढे पाहणार नाहीत अशी यांची वृत्ती आहे. तेव्हा या लांडग्यासारख्या वृत्तीला मी दोष देतोय. एखदा प्रश्न सोडविण्याच्या यांचा संकल्पना जरा विचित्रच आहेत. म्हणजे एखाद्या प्रश्नावर यांचं उत्तर काय दुसरा प्रश्न निर्माण करा पहिल्याचं आपोआप निराकरण होईल.

वाईट याचंच वाटतं की हे सगळं माहिती असूनही आपण बातम्या वाचणं, प्रतिक्रिया व्यक्त करणं यापलिकडे काहीच करू शकत नाही. सगळ्या प्रकाराची खूप चीड येते पण दुसर्‍या क्षणी मनात विचार येतो की दगडावर डोकं आपटून काही फायदा नाही आपलंच डोकं फुटेल दगड मात्र तसाच राहील निर्विकार... नेमस्त...

शब्दांकन :  अमेय बाळ

उद्या वाचा प्रख्यात शिल्पकार उत्तम पाचारणे यांची जळजळीत प्रतिक्रिया.

No comments:

Post a Comment